लातूर:  मोबाईल चार्जिंगला लावताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लातूरमधील तळेगावात घडली. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे 17 वर्षाच्या तरुणाला शॉक लागल्याचा दावा, तेळगावच्या गावकऱ्यांनी केला आहे.


त्यामुळेच तरुणाचा मृतदेह थेट महावितरणच्या कार्यलयासमोर ठेवण्यात आला.

तळेगावात ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या भागात विद्युत पुरवठा अनियमीत असणे, व्होल्टेज कमी -जास्त होणे असे प्रकार वारंवार घडत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. याच कारणामुळे ही दुर्घटना घडल्याचा दावाही करण्यात येत आहे.

इतकंच नाही तर यापूर्वी अचानक विद्युत पुरवठा कमी-जास्त होणे, हाय व्होल्टेजमुळे याच गावातील  अशोक लावटे, दत्ता चौधरी या दोन नागरिकांचा शॉक लागून मृत्यू झाला होता. आता पुन्हा तशीच घटना घडल्याने गावकरी आक्रमक झाले आहेत.

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सकाळी 7 च्या सुमारास शिरुर अनंतपाळ इथल्या महावितरणच्या कार्यालयासमोर मृतदेह आणून ठेवला होता. पण साडेअकरा वाजेपर्यंत महावितरण कार्यालय उघडलंच नव्हतं.

जोपर्यंत गावातील ही समस्या दुरुस्त होत नाही, डीपी बसत नाही, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.