होय, मी नाराज आहे : भास्कर जाधव
एबीपी माझा वेब टीम | 27 Oct 2016 02:06 PM (IST)

रत्नागिरी: "मी माझ्या लोकांना- कार्यकर्त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. पण माझ्या कार्यकर्त्यांवरील अन्याय मी आणखी किती सहन करू", असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकणातले नेते भास्कर जाधव यांनी पक्षाला विचारला आहे. आज चिपळूणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. "मी माझ्या लोकांना- कार्यकर्त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. पण माझ्या कार्यकर्त्यांवरील अन्याय मी आणखी किती सहन करू. मी कुठेही जाण्याचा विचार केला नाही, करणार नाही, पण माझ्या कार्यकर्त्याला पक्षात न्याय मिळत नसल्याने मी नाराज आहे", असं भास्कर जाधव म्हणाले. यावेळी भास्कर जाधव यांनी जिल्ह्यातल्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आपल्या समर्थकांना विश्वासात घेतलं जात नसल्याची खंत व्यक्त केली. इतकंच नाही, तर गेल्या 12 वर्षात आपल्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीपासून दूर ठेवल्याचा आरोपही जाधव यांनी केला. त्यामुळे यापुढे जिल्ह्याचं नेतृत्त्व करणार नसल्याचं स्पष्टीकरण जाधव यांनी दिलं आहे.