यवतमाळ : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार बनल्यानंतर भाजपला पहिला मोठा धक्का बसला आहे. यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीच उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय झाला आहे. 31 जानेवारीला विधानपरिषदेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ही निवडणूक पार पडल्याने त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.


महाराष्ट्र विकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी यांना 298 मतं मिळाली. तर भाजप उमेदवार सुमीत बाजोरिया यांना 185 मतं मिळाली. याशिवाय सहा मतं अवैध ठरली. या निवडणुकीत एकूण 489 मतदार होते. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, केळापूर, राळेगांव, यवतमाळ, दारव्हा, पुसद, उमरखेड या सात ठिकाणी मतदान घेण्यात आलं होतं.

अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने ही निवडणूक महाराष्ट्र विकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी आणि भाजपचे उमेदवार सुमीत बाजोरिया यांच्यात ही लढत झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात चतुर्वेदी यांनी बाजी मारली. दरम्यान, दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी यवतमाळमध्ये फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.


कोण आहेत दुष्यंत चतुर्वेदी?
नागपूर येथे जन्मलेले दुष्यंत चतुर्वेदी लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे ते संचालक आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठचे सिनेट सदस्यही आहेत. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे ते पुत्र असून काही दिवसापूर्वी त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानषरिषद निवडणुकीत ते शिवसेनेचे म्हणजेच महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार होते.

कोण आहेत सुमीत बजोरिया?
सुमीत बजोरिया राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांचे धाकटे बंधू आहेत. सुमीद बजोरिया विदर्भातील मोठे कंत्राटदार आहेत. सिम्बॉयसिस येथून त्यांनी बी. कॉम, एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. यवतमाळ नगरपरिषदचे ते माजी सदस्य आहेत, जिल्हा कंत्राटदार संघाचे माजी अध्यक्ष होते, जिल्हातील सर्व पक्षाच्या नेत्यांशी त्यांची जवळीक आहे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा जवळीक असलेले बाजोरिया यांना भाजपने उमेदवारी दिली होती.