यवतमाळ : झाडावर चढून विरुगिरी करत एका शेतकऱ्याने आंदोलन केले. कीटकनाशक फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे मृत पावलेल्यांच्या नातेवाईंना आर्थिक मदतीसह कर्जमाफीची मागणी या शेतकऱ्याची आहे. धनंजय वानखडे असे या आंदोलक शेतकऱ्याचं नाव आहे.


यवतमाळ आर्णी मार्गावरील अर्जुना गावाजवळील एका झाडावर हा शेतकरी चढला आणि त्याच्या मागण्या मोठ्या-मोठ्याने सांगू लागला. शेतकऱ्याच्या या विरुगिरी आंदोलनामुळे महसूल यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली.

दारव्हा तालुक्यातील शिंदी येथील धनंजय वानखडे शेतकरी आज सकाळच्या सुमारास झाडावर चढले. झाडावर चढण्याआधी धनंजय वानखडेंनी सरकारविरोधी घोषणा देत, रास्ता रोको आंदोलनही केले.

सरकारने कर्जमाफी द्यावी, तसेच कीटकनाशक फवारणीतील मृतांच्या नातेवाईकांना मदत म्हणून 10 हजार रु तात्काळ द्यावे, या मागण्या धनंजय वानखडे यांच्या आहेत.

तीन तास झाडावर चढून राहिलेल्या धनंजय वानखडे यांना मोठ्या कसरतीने पोलिस आणि महसूल विभागाने खाली उतरवले.