नवरा वेळ देत नसल्याने पत्नीची आत्महत्या, औरंगाबादमधील खळबळजनक घटना
एबीपी माझा वेब टीम | 22 Oct 2016 08:24 AM (IST)
औरंगाबाद : नवरा वेळ देत नसल्याने पत्नीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पडेगावच्या रामगोपाळनगरमध्ये घडली आहे. प्रवलिका टेरम मनोहर असे मृत महिलेचं नाव आहे. नवरा आपल्याला वेळ देत नाही म्हणून पत्नीने आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे पत्नीने आत्महत्येपूर्वी नवऱ्याला सेल्फी पाठवला. त्यानंतर आयसीआयसीआय बँकेत उपमहाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेला पती तातडीने घराच्या दिशेने आला. मात्र, त्याआधीच पत्नी मृत्यूमुखी पडली होती. एक महिन्यापूर्वीच प्रवलिकाचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर ती पतीसह औरंगाबादमधील पडेगावच्या रामगोपाळनगरमध्ये राहण्यासाठी आली होती. लग्नाआधी ज्याप्रकारे नवरा वेळ देत होता, तसा लग्नानंतर देत नसल्याची प्रवलिकाची तक्रार होती, अशी माहिती मिळते आहे. मात्र, या क्षुल्लक कारणावरुन आयुष्य संपवल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, घटनेच्या ठिकाणी तामिळी भाषेत सुसाईड नोट सापडली आहे.