'निर्भया'साठी महिला बालविकास विभागाच्या तिजोरीत खडखडाट
एबीपी माझा वेब टीम | 04 Sep 2016 06:36 AM (IST)
उस्मानाबादः बलात्कार, महिला अत्याचार अशा घटनांना अर्थसाहाय्य देण्यासाठी महिला बालविकास विभागाने 'मनोधैर्य' ही योजना सुरु केली. मात्र या योजनेसाठी विभागाकडे निधीच नसल्याचं समोर आलं आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्राला उत्तर देताना महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लेखी कबुली दिली आहे. पंकजा मुंडेंनी कबुली दिलेलं पत्र 'एबीपी माझा'च्या हाती लागलं. राज्यात 2013 पासून 3 हजार 714 महिलांवर अत्याचार झाले. त्यापैकी 1 हजार 999 पीडितांना अर्थसाहाय्य मिळालं. मात्र 1 हजार 194 पीडितांना देण्यासाठी विभागाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं समोर आलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर तिला उपचारासाठी पैसे नव्हते. यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी निधी नसल्यामुळे इतर खात्याचे पैसे वळवून पीडित मुलीच्या आईच्या हातात 41 हजारांचा चेक दिला. राज्यातील पीडित महिलांची संख्या लक्षात घेता यासाठी सरकारने अर्थसंकल्पातच मोठ्या निधीची तरतूद करणं गरजेचं आहे. मात्र अत्याचाराची घटना घडल्यानंतर उपचार करण्यासाठी शासनाकडे पैसे नसल्याचं संतापजनक सत्य समोर आलं आहे.