मुंबई : राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. परंतु शिवसेनेशिवाय आम्ही सत्तास्थापन करु शकत नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, 'आम्ही सत्तास्थापन करणार नाही'. त्यामुळे आता राज्यपाल राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तास्थापन करणार का? असा सवाल राज्यातील जनतेसमोर उपस्थित झाला आहे.


राज्यात भाजपशिवाय शिवसेनेला सत्तास्थापन करायची असेल तर त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे आता सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांकडे पाठिंबा मागायला जाणार का? याकडे राज्याचे संपूर्ण लक्ष लागले आहे.


दरम्यान एबीपी माझाने शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बातचित केली. यावेळी संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे नेते कालपर्यंत म्हणत होते की, त्यांचाच मुख्यमंत्री होणार. मग आज त्यांनी सत्तास्थापन करणार नाही, असं राज्यपालांना का सांगितलं? आता ते मागे का हटले?


आम्ही सत्तास्थापन करणार नाही आणि शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदही देणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यांची काहीही भूमिका असो, परंतु राज्याला शिवसेनेचाच मुख्यमंत्री मिळणार, असे संजय राऊत यांनी सांगितले. परंतु शिवसेना भाजपसोबत सत्तास्थापन करणार की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन करणार? ही बाब संजय राऊत यांनी स्पष्ट केली नाही.


शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत. तर त्यांच्याकडे 8 अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा आहे. असे मिळून शिवसेनेकडे 64 आमदारांचे संख्याबळ आहे. राष्ट्रवादीकडे 54 तर काँग्रेसकडे 44 आमदारांचे संख्याबळ आहे. तिन्ही पक्षांकडे मिळून 162 आमदारांचे संख्याबळ आहे. राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी 144 आमदारांची आवश्यकता आहे.


पाहा भाजपची नेमकी भूमिका काय?



मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार! शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं विधान