कोल्हापूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काही महिन्यांच्या तोंडावर येऊन ठेपल्या असताना, भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सगळ्यांनाच धक्का देणारी घोषणा केली आहे. यापुढे कोणतीच निवडणूक लढणार नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.


कोल्हापुरात ‘गणराया’ पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवादही साधला. या भाषणात चंद्रकांत पाटलांनी आपल्या राजकीय कारकीर्दीविषयी मोठी घोषणा केली.

मी यापुढे कोणतीच निवडणूक लढवणार नाही, असे सांगत चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “मला ना लोकसभा, ना विधानसभा, ना पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवायची. मी कोणतीच निवडणूक लढवणार नाही.”

चंद्रकांत पाटील हे राज्य भाजपमधील अत्यंत मोठे नेते असून, राज्य मंत्रिमंडळातही त्यांच्याकडे महत्त्वाची मंत्रिपदं आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री, महसूल मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री अशी तीन महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी आपलं सार्वजनिक आयुष्याची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना असलेल्या अभाविपच्या माध्यमातून केले. 2004 साली भाजपमध्ये प्रवेश करत, त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला.

पुढे 2013 साली चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष झाले. 2014 मध्ये ते विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 साली राज्यात सत्ता आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. सध्या त्यांच्याकडे तीन महत्त्वपूर्ण खाती असून, राज्य मंत्रिमंडळातून वजनदार मंत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.