मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह आहे. जयंती उत्सवासाठी शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर मोठा उत्साह पाहायला मिळाला. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राजकीय कोट्या देखील केल्याचं समोर आलं. यात विशेष चर्चा झाली ती उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या डोळ्याच्या भाषेची.


त्याचं झालं असं की, आमदार अतुल बेनके यांनी आपल्या भाषणात अजित दादांचं कौतुक करताना म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराजांना सात भाषा यायच्या. त्यापैकी एक भाषा म्हणजे डोळ्याने ते मावळ्यांना सांगायचे. त्यांची सांकेतिक खूण मावळ्यांना योग्य सूचित करायचे. आत्ता अशी भाषा उपमुख्यमंत्री अजित पवार वापरतात. बेनकेंनी असं म्हणताच अजित दादांनी हात जोडले.


मात्र बेनकेंच्या या वक्तव्याचा आधार घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी चांगलीच फिरकी घेतली. मुख्यमंत्री म्हणाले की, आमदार अतुल बेनके म्हणाले दादांना डोळ्याने ओळखणारी भाषा येते. आता मला ती भाषा शिकावी लागणार आहे. का? तर मला दादाच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. अगदी गॉगल घातलं तरी मी दादाच्या मनातलं सगळं ओळखून दाखवणार, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि एकच हशा पिकला.


Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : शिवरायांच्या जयंती राज्यात उत्साह, पण 'हे' नियम मात्र पाळावे लागणार


कोरोनाबरोबर आपलं युद्ध सुरु, मास्क हीच आपली ढाल : मुख्यमंत्री ठाकरे
मुख्यमंत्री म्हणाले की, माझं हे दुसरं वर्ष आहे. हा बहुमान जिजाऊ, शिवाजी महाराज आणि तुमच्यामुळं लाभलेलं आहे. आता कोरोनाबरोबर आपलं युद्ध सुरु आहे. या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, वातावरण छान आहे, पण तोंडावर मास्क आहे. महाराजांच्या काळातील युद्ध आपल्याला करावे लागत नसले तरी कोरोनाशी आपलं युद्ध सुरू आहे. यासाठी आपली ढाल म्हणजे मास्क आहे. नुसती तलवार हातात घेतली म्हणजे युद्ध जिंकता येत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, काही साप आहेत. ते वळवळ करतायेत, त्यांना ठेचायचं असतं आणि आपण पुढे जायचं असतं, असं ते म्हणाले.



Shiv Jayanti 2021 : कोरोनाबरोबर आपलं युद्ध सुरु, मास्क हीच आपली ढाल : मुख्यमंत्री ठाकरे


रायगडावर केलेली लायटिंग उत्साही लोकांचा अजाणतेपणा- अजित पवार
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शिवजयंती जोमाने साजरी करावी यात दुमत नाही. पण सध्या कोरोना पुन्हा कहर माजवू लागलाय. मंत्र्यांना ही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे शिवजयंती सारखे उत्सव नाईलाजाने थोडक्यात घ्यावे लागतायेत. शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी देखील मावळ्यांचा जीव धोक्यात घालणारा निर्णय कदापि घेतला नसता, असं अजित पवार म्हणाले. शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे कैवारी होते, ते शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घ्यायचे, असंही अजित पवार म्हणाले.


ते म्हणाले की, गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली होती. तो 23 कोटी 50 लाखांचा निधी आज पोहोचलेला आहे. आता या निधीतून दर्जेदार काम व्हायला हवं. हे निधी गडाच्या संवर्धनासाठी आहे, याच भान सर्वांनी ठेवायला हवं. यात वेळ न दवडता करता वेळेतच विकासकाम पूर्ण व्हायला हवं अशी तंबी देखील अजित पवारांनी दिली.


कोरोना स्थितीसंदर्भात रविवारी महत्वाची बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोनामुळं काल काही जिल्ह्याबाबत आम्ही निर्णय घेतले. आरोग्य मंत्री राजेश टोपे, जयंत पाटील अशा अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. कोरोना फोफावत असताना नागरिक निष्काळजीपणा दाखवत आहेत, त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल. याची कल्पना ठेवायला हवी. ते म्हणाले की, पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णाबाबत रविवारी बैठक. आज हा कार्यक्रम असल्याने मी रविवारी बैठक घेतली आहे. मास्क बाबत कडक कारवाई करायला हवी. रायगडावर केलेली लायटिंग केली, हा उत्साही लोकांमुळे घडतंय. त्यांचा अजाणतेपणा दिसून येतोय. पण महाराजांचा वारसा आहे, तिथं असं घडणं चुकीचं आहे, असं ते म्हणाले.