Prajakt Tanpure : ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाच विजेच्या लपंडावचा फटका बसला आहे. एका खासगी कार्यक्रमात बोलत असतानाच दोन वेळा वीज पुरवठा खंडित झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे हे विजेच्या प्रश्नावर बोलत असतानाच विद्युत पुरवठा खंडित झाला. दरम्यान, अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच तारंबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
मंत्री प्राजक्त तनपुरे हे मनमाडमधील क्लिनिकच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत असतानाच अचानक वीज पुरवठा खंडित झाला. यावेळी अधिकाऱ्यांची पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, यावेळी बोलताना तनपुरे यांनी भाजपवर निशाणा साधला. राज्यातील वीज संकटाला आताचे केंद्र आणि तत्कालीन फडणवीस सरकारच जबाबदार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. केंद्र सरकार कोळसा पुरवठा सुरळीत करत नसल्याचा आरोपही तनपुरे यांनी यावेळी केला. फडणवीस सरकारच्या काळात वीज निर्मितीचा एकही नवा प्रकल्प तयार झाला नाही, कुठल्याही प्रकल्पची क्षमता वाढली नसल्याचे ते म्हणाले.
भाजपने आरोप करण्याआधी विचार करावा. केंद्र सरकारकडून कोळशाचा पुरवठा होत नसल्याने भारनियमन होत आहे. रोजच्या मागणीनुसार कोळशाचा पुरवठा कमी होत आहे. चढ्या भावाने वीज खरेदी करत आहोत. भाजपच्या काळात अकही नवीन प्रकल्प झाला नाही. जे प्रकल्प आहेत त्यांची क्षमता भाजपच्या काळात वाढली आहे का? असा सवालही तनपुरे यांनी भाजपला केला. तुम्ही या राज्याला विजेच्या बाबातीत स्वंयपूर्ण करण्यासाठी कोणतेही पाऊस उचलले नाही. तुम्ही महावितरणची परिस्थिती नाजूक केली आहे. त्यामुळे भाजपला बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे तनपुरे म्हणाले.