मुंबई : येत्या 5 ते 14 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीचा इशारा वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषीमंत्र्यांनीही पिकांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.


मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागात 5 ते 14 ऑक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कापणीवर आलेल्या आणि कापणी झालेल्या शेतमालाची सुरक्षितपणे साठवणूक करा, असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं आहे.

अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतमालाचे नुकसान टाळावे, यासाठी त्यांनी आपल्या शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच जेथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा तसे नियोजन केले असेल, त्याठिकाणी शेतमाल व्यवस्थित झाकून ठेवावा, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केलं आहे.

तसंच जनावरांनाही झाडं, शेड यांच्या आसऱ्याला बांधू नये, असंही सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई आणि कोकण पट्ट्यातसुद्धा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

राज्यात चार महिन्यात किती पाऊस पडला? विभागनिहाय आकडेवारी