Maharashtra Political Crisis :आमचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी दिल्लीत माध्यमांसोबत संवाद साधला.


शरद पवार म्हणाले, " अद्यापही आमची आघाडी असून ही आघाडी कायम ठेवू. शिवसेनेचे बंडखोरी केलेले आमदार मुंबईत परतल्यानंतर आपली भूमिका बदलतील. आमदारांना परत आणण्यासाठी लवकरच पावले उचलली जातील. शिवसेना याबाबत आजच पावले उचलेल. शिवाय आज नाही तर उद्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील. एकनाथ शिंदे यांच्याकडे संख्याबळ असेल तर त्यांनी मुंबईत यावे. संख्याबळ असेल तर ते गुवाहाटीत का थांबले आहेत"


सरकार पाडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. कालच एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा आम्हाला पाठिंबा असल्याचे म्हटले होते.  बंडखोर आमदार पहिल्यांदा सुरतला गेले. त्यानंतर ते गुवाहाटीला गेले. या दोन्ही राज्यात कोणाचे सरकार आहे? असा प्रश्न उपस्थित करत शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. 


आमची कमिटमेन्ट उद्धव ठाकरेंसोबत 
बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे.  आमची कमिटमेन्ट उद्धव  ठाकरे यांच्यासोबत असून आम्ही त्यांच्यासोबत आहे. याबरोबरच काही जण ही मॅच फिक्सिंग असल्याचे म्हणत आहेत. परंतु, यात तथ्य नाही. कारण असे असते तर आम्ही एवढी ओढाताण का करत आहोत? राज्यात एवढी आंदोलने का होत आहेत? असा प्रश्न शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला. 


राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या चर्चेबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, राष्ट्रपती राजवट लागू झाली तर भाजपने एवढं कशासाठी केलं? राष्ट्रपती राजवट लागू होणार असेल तर आमदारांच्या बंडाला काय अर्थ आहे? असा प्रश्न उपस्थित करत  राज्यातील सरकार स्थिर असून आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहोत. शिवाय गेलेले आमदार मुंबईत आल्यानंतर आपली भूमिका बदलतील, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.