पंढरपूर : "चांगली कामे करून निवडून येता येते, यावर माझा विश्वास राहिलेना नाही. तसे असते तर आयुष्यभर लोकांची कामे करणारे मी आणि सुशीलकुमार शिंदे निवडणुकीत कधीच पराभूत झालो नसतो." अशी खंत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली. शुक्रवारी पंढरपूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात राणे बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दोन माजी मुख्यमंत्री मेळाव्याला उपस्थित असूनही शेतकरीवर्गाने मात्र या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याचे रिकाम्या खुर्च्यांवरून दिसत होते.


शिवसेना-भाजप युतीनंतर नारायण राणे काँग्रेसच्या मंचावर उपस्थित होते. त्यामुळे राणे काय म्हणतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु राणे यांनी दुष्काळी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना भेटून मदत देण्याचे आश्वासन दिल्याने अजूनही राणे हे भाजपच्याच प्रेमात असल्याचे पाहायला मिळाले.

नारायण राणे म्हणाले की, "कोणत्याही पक्षासोबत आघाडी न करता आम्ही (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)निवडणूक लढवणार आहोत. किती जागा लढवायच्या ते अद्याप निश्चित केलेले नाही." परंतु युती होणार नाही या विश्वासावर भारतीय जनता पक्षाच्या जवळ गेलेल्या नारायण राणे यांना शिवसेना-भाजप युतीमुळे चांगलाच झटका बसला आहे. त्यामुळे युती करणार नाही म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी लाचारी पत्करली याचे उत्तर मिळत नसल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

"अजून आपली सोलापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली नसल्याचे सांगत शेजारच्या मतदारसंघात उमेदवार जाहीर झाला आहे, कारण त्यांच्या पक्षाचे ते स्वतः मालक आहेत." असे म्हणून सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माढा येथील उमेदवारीबाबत भाष्य केले.