मुंबई : शिवसेना सोबत येत नसल्यामुळे आम्ही सत्तास्थापन करु शकत नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे राज्याच्या राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. या निमंत्रणावर चर्चा करण्यासाठी भाजप कोअर कमिटीच्या दोन बैठका पार पडल्या. या बैठकीनंतर भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीवेळी भाजप नेत्यांनी आम्ही सत्तास्थापन करण्यासाठी असमर्थ आहोत, असे सांगितले.


महाराष्ट्रातील जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला कौल दिला आहे. परंतु भाजप सत्ता स्थापन करणार नाही. जनादेशाचा अपमान करुन शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना शुभेच्छा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

राजभवनावर भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि गिरीष महाजन उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले की, राज्यातील जनतेने भाजप, शिवसेना, आरपीआय, रासपसह इतर मित्रपक्षांना (महायुतीला) सत्तास्थापनेसाठी कौल दिला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आम्ही सत्तास्थापन करायला हवी. परंतु शिवसेना आमच्या सोबत येत नसल्यामुळे आम्ही सत्तास्थापन करु शकत नाही. परंतु शिवसेना जर जनादेशाचा अपमान करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापन करु इच्छित असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.

पाहा भाजपने काय भूमिका घेतली आहे