स्थानिक पातळीवर युतीशिवाय जिंकू शकतो, रावसाहेब दानवेंना विश्वास
एबीपी माझा वेब टीम | 11 Jan 2017 09:10 PM (IST)
मुंबई : स्थानिक पातळीवर युतीशिवाय जिंकू शकतो, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी व्यक्त केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत रावसाहेब दानवेंनी पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’चे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. “स्थानिक पातळीवर युतीशिवाय निवडणूक जिंकू शकतो. मात्र, राज्य पातळीवर जो निर्णय होईल तो कार्यकर्त्यांना मानावा लागेल. मला असं वाटत युती सन्मानपूर्वक आणि भाजपची वाढलेली ताकद लक्षात घेऊन झाली तर आमचे कार्यकर्ते राज्याचा निर्णय ऐकतील.”, असे दानवे म्हणाले. आज अनिल देसाईंशी बोलणं झालं असून, युतीबाबत सकारात्मक आहोत. आता लवकर चर्चा सुरु करू, असेही रावसाहेब दानवे म्हणाले. “नगरपालिका निवडणुकीत भाजप नंबर एकच पक्ष ठरला. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही आम्ही एक नंबरचा पक्ष ठरल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा परिषद, महापालिकेची तयारी झालेली आहे.”, असे दानवे म्हणाले. एकीकडे युतीसाठी चर्चा करण्याची तयारी दाखवली जाते आहे. तर दुसरीकडे भाजप नेते शिवसेनेला डिवचणारी वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपची युती करण्याची तयारी आहे की नाही हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. नाशिक आणि कल्याण-डोंबिवलीची निवडणूक भाजपनं स्वबळावर लढली होती याची आठवण करून द्यायला दानवे विसरले नाहीत.