20 लाख खर्चून वर्षापूर्वी बांधलेली पाण्याची टाकी कोसळली
एबीपी माझा वेब टीम | 13 Jun 2016 01:02 PM (IST)
सातारा : साताऱ्यातल्या कराड तालुक्यातील तांबवेमध्ये पाण्याची टाकी कोसळल्याची घटना घडली आहे. एक लाख 35 हजार लीटर क्षमता असलेली ही पाण्याची टाकी कोसळली. पहाटेच्या वेळी झालेल्या या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अवघ्या एक वर्षांपूर्वीच 20 लाख रुपये खर्च करुन ही टाकी बांधण्यात आली होती. टाकी कोसळल्यानं 6 दुचाकी आणि दोन चारचाकी वाहनांचं नुकसान झालं आहे. या प्रकरणी निकृष्ट बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. शासनाच्या निर्मल जल योजनेतून तांबवे गावासाठी 2013 साली 27 लाख खर्चाची 24 बाय 7 पाणी योजनेस मंजुरी मिळाली. या योजनेचे काम शिवरत्न नावाच्या ठेकेदाराला देण्यात आलं होतं. जानेवारी 2015 मध्ये हे काम पूर्ण झालं.