सोलापूरसाठी उजनी धरणातून 15 हजार क्यूसेकने विसर्ग
राहुल ढवळे, एबीपी माझा | 25 Mar 2018 11:22 AM (IST)
12 दरवाजातून सध्या 15 हजार क्यूसेकन वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या उजनी धरणात 61.69 टक्के पाणीसाठा आहे. ऐन उन्हाळ्यात उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्याने सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे.
सोलापूर : उजनी धरणातून काल (शनिवारी) रात्री सोलापूरसह नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आलं. 12 दरवाजातून सध्या 15 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणात सध्या 61.69 टक्के पाणीसाठा आहे. यावेळी जवळपास 5 टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याचं उजनी विभागाकडून सांगण्यात आलं. सुरुवातीला शनिवारी रात्री 9 वाजता अडीच हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आलं. ऐन उन्हाळ्यात उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्याने सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. कारण, सोलापूरला पाणी पुरवठा करणारा औज बंधारा सध्या कोरडा पडलाय, तर टाकळी बंधाऱ्यात काही दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी आणि पंढरपूरच्या वारीसाठी पाणी सोडण्याची मागणी होती. सोलापूरच्या औज बंधाऱ्यात पाणी पोहोचण्यास अजून 10 ते 12 दिवस लागणार असल्याने काटकसरीने पाणी वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर उजनीतून पाणी सोडण्यात आल्याने प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.