लातूर: दुष्काळानं त्रस्त झालेल्या लातुरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आजची सकाळ ही लातुरकरांसाठी नव्या सुर्योदयासह एक नवी उमेद घेउन आली आहे. असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.


 

कारण, गेले कित्येक दिवस पाण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लातुरकरांची पाण्याची प्रतीक्षा अखेर आज संपुष्टात आली आहे. कारण पाण्याची मिरज एक्सप्रेस आज सकाळी लातुरात दाखल झाली आहे.



पाण्याचे 10 वॅगन्स या एक्सप्रेसला जोडण्यात आले होते. एका वॅगनमधून साधारणपणे 50 हजार लिटर पाणी नेण्यात आलं आहे. त्यामुळे या पहिल्या खेपेला लातूरकरांना तब्बल ५ लाख लीटर पाणी मिळणार आहे. तसेच लवकरच उर्वरित वॅगनही लवकरच लातूरकडे पाठवली जाणार आहेत.

 

दरम्यान, लातूरात भीषण पाणीटंचाई असल्याने सरकार याआधी उजनी धरणातून रेल्वेनं लातूरला पाणी देणार होतं. मात्र त्यातही अडचणी आल्याने मिरजची निवड करण्यात आली. एखाद्या जिल्ह्याला रेल्वेने पाणी देण्याची वेळ महाराष्ट्रावर पहिल्यांदाच ओढावली आहे.

 

संबंधित बातम्या:

 

ना थांबा, ना क्रॉसिंग, 8 तासात पाणी एक्स्प्रेस लातुरात?