CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जलसंधारणाच्या कामाला (Water conservation work) गती देण्यावर चर्चा झाली आहे. तसेच 3 महत्वाचे करार देखील झाले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) आणि मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) तसेच विविध विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.
3 महत्वाचे करार कोणते?
1) टाटा मोटर्स, नाम फाऊंडेशन आणि मृद व जलसंधारण विभाग
टाटा मोटर्स, नाम फाऊंडेशन आणि मृद व जलसंधारण विभाग यांच्यात जलसंधारणाच्या कामालासंदर्भात एक महत्वाचा करार करण्यात आला आहे. यामाध्यमातून 23 जिल्ह्यात 1000 जलाशय तयार करण्यात येणार आहेत. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थित हा करार करण्यात आला आहे.
2) भारतीय जैन संघटना आणि मृद व जलसंधारण विभाग
भारतीय जैन संघटना आणि मृद व जलसंधारण विभाग यांच्यात देखील जलसंधारणाच्या कामासंदर्भात एक करार झाला आहे. जलसंधारणासाठी मनुष्यबळ पुरवण्यात येणार आहे.
3) MRSAC आणि मृद व जलसंधारण विभाग
MRSAC आणि मृद व जलसंधारण विभाग यांच्यातही करार झाला आहे. यामध्ये जलसाठे तयार करण्यासाठी तंत्रज्ञान पुरवण्यात येणार आहे.
गावागावात जाऊन काम करायचंय : नाना पाटेकर
नाम फाउंडेशनचं जलसंधारणचं काम आहे त्याची बैठक होती. सामुदायिकरित्या जलयात्रा करायची असल्याचे अभिनेते नाना पाटेकर म्हणाले. गावागावात जाऊन काम करायचं आहे. प्रत्येक गावात जाऊन काम करायचं आहे. लोक सहभाग होतायत त्यासंदर्भात बैठक होती. मागच्या वेळी काम सुरु केलं तेव्हा फडणवीस होते मध्यंतरी शिंदे होते आताही फडणवीस आहेत असे नाना पाटेकर म्हणाले. त्यामुळं कामाला कोणतीही समस्या नसल्याचे पाटेकर म्हणाले.
नाम संस्थेनं 9 वर्षात 1 हजारपेक्षा अधिक गावात काम केलं : मकरंद अनासपुरे
एका करारासंदर्भात सरकारसोबत बैठक होती, अशी माहिती अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी बैठकीपूर्वी दिली होती. नाम ही संस्था आमची नाही सर्वांची आहे. ही संस्था 10 वर्ष पूर्ण करत आहे. त्याचा आनंद असल्याचे अनासपुरे म्हणाले. 9 वर्षात 1 हजारपेक्षा अधिक गावात आम्ही काम केलं आहे. आता यां वर्षात अधिक गावात काम करु असेही अनासपुरे म्हणाले. यावेळेस 23 जिल्ह्यात काम करणार आहोत, लोकांनी सहभागी व्हावं असं आम्ही त्यांनी आवाहन करत असल्याचे अनासपुरे म्हणाले. लोकांनी लोकांसाठी सुरु केलेली ही चळवळ आहे. सरकार चांगली मदत करत आहे. त्यामुळं पुढेही चांगलं काम होईल अशी आशा असल्याचे अनासपुरे म्हणाले.