उल्हासनगर : वेळेवर पाणी सोडलं नाही, या रागारुन इमारतीच्या सेक्रेटरीने वॉचमनची हत्या केल्याचा प्रकार उल्हासनगरात घडला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असला, तरी घटनेला दोन दिवस उलटूनही अद्याप आरोपी सेक्रेटरीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.


उल्हासनगरच्या कॅम्प २ मधील खेमाणी परिसरात मेनका अपार्टमेंट असून या इमारतीत विकास सोनार हा वॉचमन म्हणून काम करत होता. मूळचा नेपाळचा असलेला विकास हा याच इमारतीत पार्किंगमध्ये राहत होता.

सोमवारी वॉचमनने इमारतीत पाणी वेळेवर सोडलं नाही आणि इतर कामंही तो नीट करत नसल्याच्या रागातून इमारतीचा सेक्रेटरी विकी तलरेजा याने विकासला झापलं. यावेळी दोघांमध्ये वाद झाल्यानं विकी याने विकासचा गळा दाबला आणि त्याची हत्या केली.

या प्रकारानंतर विकासाच्या पत्नीच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र या घटनेला दोन दिवस उलटूनही अद्याप पोलिसांनी आरोपी विकी तलरेजाला अटक केलेली नाही. बुधवारी दुपारच्या सुमारास विकी स्वतः पोलीस ठाण्यात आला होता, मात्र तरीही त्याची चौकशी करून त्याला सोडून देण्यात आलं. त्यामुळे पोलीस त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? असा प्रश्न उपस्थित झालाय.