पंढरपूर : गोव्याला फिरायला निघालेल्या जळगाव जिल्ह्यातील तीन युवकांवर काळाने घाला घातला. अहमदनगर-करमाळा रस्त्यावरील अपूर्ण कामामुळे कार कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात तिघांना प्राण गमवावे लागले.


तिघंही जण जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या इस्लामपूरचे रहिवासी होते.

फारुख शेख, फरहान खान आणि सहरीन शेख हे तिघे बोलेरो कारने, तर त्यांचे इतर मित्र दुसऱ्या गाडीने गोव्याला जायला निघाले होते. मात्र गोव्यात पोहचण्यापूर्वीच त्यांना मृत्यूने गाठलं. करमाळा-टेंभूर्णी रस्त्यावर कुंभेज गावाजवळ असताना पहाटे त्यांची कार कालव्यात पडली.

नगर-करमाळा रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम अपूर्ण आहे. या ठिकाणी कोणताही माहिती फलक नाही. यामुळेच हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी शंभरहून अधिक प्रवाशांचा याच अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे अपघाती मृत्यू झाला आहे.