अमरावती-नागपूर हायवेवर ओव्हरटेक करताना अपघात, दोघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 17 Sep 2017 12:10 PM (IST)
ओव्हरटेक करताना पुलावरील कठड्याला कारची धडक बसली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर दोघं जण गंभीर जखमी आहेत.
वर्धा : स्विमिंग कॉम्पिटिशनला जाण्यासाठी गाडीचा वेग वाढवून ओव्हरटेकिंगचा प्रयत्न दोघांच्या जीवावर बेतला आहे. दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना कारची पुलावरील कठड्याला धडक बसून दोघांचा मृत्यू झाला. अमरावती-नागपूर महामार्गावरील राजणी शिवारात कारला भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करताना पुलावरील कठड्याला कारची धडक बसली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर दोघं जण गंभीर जखमी आहेत. चौघंही साताऱ्याचे रहिवासी असून नागपुरातील कामठी येथे होत असलेल्या जलतरण स्पर्धेसाठी जात होते. साताऱ्याचे दीपक विठ्ठल गाडे यांचा अपघातात मृत्यू झाला. ते बार असोसिएशनचे अध्यक्ष असल्याची प्राथमिक माहिती आहे. अथर्व मिलिंद शिंदे यालाही अपघातात प्राण गमवावे लागले. चालक नितीन माने आणि मुलगा ओम माने हे दोघे गंभीर जखमी आहेत. अपघातग्रस्तांपैकी दोघं पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी आहेत.