नंदुरबार : भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणाऱ्यांना ऊर्जामंत्र्यांनी दिलासा दिला आहे. आणखी फक्त आठवडाभरच नागरिकांना लोडशेडिंगचा त्रास सहन करावा लागेल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली.


कोळश्याची तूट भरुन काढण्यासाठी बाहेरुन कोळसा खरेदी करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात निर्णय झाला असून जलविद्युत केंद्रही सुरु झाल्याने पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होत आहे. त्यामुळे लवकरच भारनियमनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती बावनकुळेंनी दिली.

बावनकुळे नंदुरबारमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते. गेल्या सहा दिवसांपासून चंद्रशेखर बावनकुळे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

कोळशाच्या पुरवठ्यात अडचण, राज्यात तात्पुरतं भारनियमन


कमी वसुली आणि जास्त वीजहानी असलेल्या E, F आणि G गटांतील वाहिन्यांवर गरजेनुसार हे भारनियमन केलं जात आहे. या काळात ग्राहकांनी सहकार्य करावं, असं आवाहन महावितरणने केलं होतं.

वीजनिर्मिती कंपन्यांसोबत झालेल्या करारानुसार महावितरणला महानिर्मिती कंपनीकडून 7 हजार मेगावॅट आणि अदानी पॉवर कंपनीकडून 3 हजार 85 मेगावॅट वीज मिळणं अपेक्षित आहे. मात्र कोळशाची उपलब्धता आणि पुरवठ्यात आलेल्या अडचणींमुळे महानिर्मितीकडून 4 हजार 500 मेगावॅट आणि मे. अदानी कंपनीकडून 1700 ते 2000 मेगावॅट इतकीच वीज मिळत आहे.