Vitthal Cooperative Sugar factory: माढा तालुक्याचे आमदार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्याविरोधात कारखान्याचे सेवानिवृत्त कामगार आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे पुण्यातील साखर आयुक्तालयासमोर आमरण उपोषण सुरु आहे. अबिजीत पाटील आणि कारखान्याच्या संचालक मंडळाने 347 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नेमकं प्रकरण काय?
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि.वेणूनगर ता. पंढरपूर या कारखान्यास महाराष्ट्र शासनाच्या थकहमीवर एनसीडीसी संस्था नवी दिल्ली यांच्याकडून मागील थकीत देणी देण्याकरता 347.67 कोटी कर्ज मिळालेले आहे. त्या कर्ज रकमेपैकी व्यापारी पेमेंट रक्कम रुपये 59.75 कोटी रुपये तर कामगार पेमेंट रक्कम रुपये 41.87 कोटी मिळाले आहेत. परंतू ती रक्कम सदर व्यापारी व कामगार यांना अद्याप दिलेली नाही अशी माहिती व्यापारी संतोष भालेराव यांनी दिली आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या थकहमी कर्ज रकमेचा दुरुपयोग करुन शासनाची फसवणूक केल्याबद्दल कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
नेमक्या काय आहेत मागण्या?
1. महाराष्ट्र शासनाच्या थकहमीवर मिळालेल्या कर्ज रकमेपैकी मागील थकीत व्यापारी पेमेंटसाठी रक्कम रुपये 59.75 कोटी व कामगार पेमेंटसाठी रक्कम रुपये 41.87 कोटी रक्कम व्यापारी व कामगार यांना देण्यात यावी.
2. श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करुन कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी.
3. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणूनगर गुरसाळे ता. पंढरपूर जि. सोलापूर चे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील ,व्हा. चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक तसेच दोषी अधिकारी यांच्यावर फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करावा व त्यांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करून त्यांच्याकडून दुरुपयोग केलेली रक्कम वसूल करण्यात यावी.
4. श्री विठ्ठल कारखान्याने मिळालेल्या कर्जाचा विनियोग कसा केला याचा "विनियोग दाखला " नावे टाकलेली व्हाऊचर झेरॉक्स, मंजुरीची झेरॉक्स व बँक स्टेटमेंट सहित मिळावी.
5. यामध्ये जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.
अशा प्रमुख पाच मागण्या कामगार आणि व्यापाऱ्यांनी केल्या आहेत. कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक तसेच साखर आयुक्त व त्यांचे या गैर व्यवहारात अडकलेले सर्व अधिकारी आणि लेखापरीक्षक यांच्या विरोधात हे आमरण उपोषण सुरु असल्याचे भालेराव म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: