मुंबई : दहावीच्या परिक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणीचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. 2018 मध्ये 17 लाख 36 हजार 104 विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. यावर्षी वाणिज्य म्हणजेच कॉमर्स विभागाकडे विद्यार्थ्यांचा कल सर्वाधिक दिसून आला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे.


या कलचाचणीचा सविस्तर अहवाल www.mahacareermitra.in वर उपलब्ध असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेपर्यंत पोहोचायला मदत करणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्याचा दृष्टीकोन महाराष्ट्र शासनाचा आहे. पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये कलचाचणी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच देण्याचा शासनाचा मनोदय असल्याचं विनोद तावडे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

2018 मध्ये 17 लाख 36 हजार 104 विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली. या कलचाचणीतून विद्यार्थ्यांचे 7 विभागातील कल तपासण्यात आले. 2017 च्या कलचाचणी अहवालानुसार विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त कल हा ललितकला म्हणजेच फाईन आर्ट्स क्षेत्रात सर्वाधिक दिसून आला होता.