औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्पष्टता मिळत नाही तोपर्यंत निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. "छत्रपतींच्या आशीर्वादाने जोपर्यंत सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्पष्टता मिळत नाही तोपर्यंत मला निवडणूक लढण्याचा नैतिक अधिकार नाही", अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली आहे.


मराठा समाजाच्या आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील हे औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.  विनोद पाटील शिवसेनेकडून निवडणूक लढवणार अशी देखील चर्चा होती. त्यावर आज विनोद पाटलांनी स्पष्टीकरण दिले आहे. "मागील अनेक दिवसांपासून माझ्याबद्दल चर्चा आहे की, मी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार. आज मी स्पष्ट करतो, मी सदर निवडणूक लढणार नाही. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत मला निवडणूक लढण्याचा नैतिक अधिकार नाही असे मला वाटते", असं विनोद पाटलांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहीले आहे.



"सर्व मतदारांच्या आशीर्वादाने आम्ही निवडणुकीत 100% विजयी होऊ शकतो. परंतु इतर नेत्यांप्रमाणे मी देखील राजकारणात गेलो तर माझ्याकडून या राजकारणाच्या धावपळीत कोर्टातील केसकडे दुर्लक्ष होऊ शकतं", असं कारण देत विनोद पाटील यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे.

"50 पेक्षा अधिक युवकांनी आरक्षणासाठी बलिदान दिलंय. जर काही कमी जास्त झालं तर अनेकांचे जीव धोक्यात टाकण्याचा मला अधिकार नाही. त्यामुळे मी माझी नैतिकता समजून आज औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कुठल्याही पक्षाकडून लढणार नाही हे स्पष्ट करतो", असं विनोद पाटलांनी म्हटलं आहे.


काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांनी आपल्याला बिनशर्त पुरस्कृत उमेदवारी देऊ केली होती असंही त्यांनी म्हटलं आहे.


राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेल्या आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले असले तरी सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.