मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन जम्मू काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. या घोषणेनंतर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे वेध सर्वांना लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडी व महायुती असा सामना निश्चित झाला असून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याने महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास दुणावल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करत महिला वर्गास आपलसं करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असेच दिसून येते. लोकसभेला महायुतीचा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्याने विधानसभेचं चित्र काय असेल, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा पहिला एआय सर्व्हे समोर आला आहे. 


लोकसभा निवडणुकांमधून महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील कौल दिसून आला आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी आजच निवडणुकांसाठी तयार असल्याचं सांगत असून स्वत: उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात आजच निवडणुकांची घोषणा करा, आम्ही तयार आहोत असे म्हटले. मात्र, एआयच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रतील निवडणुकांसाठी आज मतदान झाल्यास नेमकं चित्र काय असेल, हे तुम्ही या लेखातून समजून घेऊ शकता. 


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरू शकते का, मुख्यमंत्रीपदासाठी मराठी माणसांची कोणाला पसंती आहे? राज्यात कोणाचे सरकार स्थापन होईल?, या प्रश्नांची उत्तरे जिनिया एआय सर्वेक्षणातून समोर आली आहेत. एआय सर्वेक्षणातून राज्यातील लाखो लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. एआय या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा सर्वे करण्यात आला असून 47 टक्के लोकांनी भाजप नेतृत्त्वातील महायुतीला फायदा होईल, असा कौल दिल आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कोणता, असा प्रश्न विचारला असता विकासाच्या मुद्द्यावर 25 टक्के लोकांनी कौल दिला असून 20 टक्के लोकांनी कल्याणकारी योजनेबाबत आपलं मत मांडलं. तर, राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 10 टक्के लोकांनी विधानसभा निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा असल्याचं भाष्य केलं आहे. तसेच, 15 टक्के नागरिकांनी बेरोजगारी हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं म्हटलं. तर, भ्रष्टाचार आणि महागाईच्या मुद्द्यावरही अनुक्रमे 15-15 टक्के लोकांनी कौल दिला. 


कोण बनवणार सरकार?


कोणता पक्ष महाराष्ट्रात सरकार बनवू शकतो, असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारला असता, 38 टक्के लोकांनी भाजपला पसंती दिली आहे. तर, 22 टक्के लोकांनी शिवसेना शिंदे गटाला मत देणार असल्याचं म्हटलं. तर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 17 टक्के लोकांनी मत दिले आहे. या सर्व्हेक्षणात 14 टक्के जनतेनं काँग्रेसला पसंती दिली असून केवळ 9 टक्के लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पहिल्या क्रमाकांची पसंती दिली आहे. दरम्यान, झी न्यूजच्या माध्यमातून मराठीमध्ये पहिल्यांदाच एआय अँकरच्या माध्यमातून हे सर्वेक्षण झालं आहे. 


हेही वाचा


इंदापूरची जागा महायुतीची?; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच काढलं, भरणे मामांचं टेन्शन वाढवलं