नागपूर : राजधानी मुंबईसह राज्यभरात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र विदर्भाची तहान अजूनही भागलेली नाही. कारण विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये अजून दुष्काळसदृष परिस्थिती आहे.
पावसाळा संपत आला तरी वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी धरणाने अजून तळ गाठलेला आहे. सध्या या धरणात फक्त 21 टक्के पाणीसाठा आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणाचीही हीच परिस्थिती आहे. इसापूर धरणावर विदर्भ मराठवाड्यातील 1 लाख 25 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येते. पण यंदा इथे फक्त 10 टक्के पाणीसाठा आहे.
विदर्भाकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे इथले सर्वच सिंचन प्रकल्प तहानलेले आहेत. त्यामुळेच ऐन पावसाळ्यात बुलडाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना 15 दिवसआड पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव सिंचन मंडळाने सरकारला पाठवल्याची माहिती आहे. जिथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तिथे पिकांचा तर विचारही करायला नको. यवतमाळच्या महागावमधील खडगा गावात पावसाअभावी पिकांची वाईट अवस्था झाली आहे. विदर्भातील धरणांची सद्यस्थिती
धरण यंदाचा साठा गेल्यावर्षीचा साठा
तोतलाडोह 29 71
खिंडसी 31 34
इटियाडोह 39 75
शिरपूर 15 98
पुजारीटोला 12 96
कालीसरार 23 96
असोलामेंढा 33 90
बावनथडी 39 22
पूस 22 100
अरुणावती 24 87
बेंबळा 29 53
काटेपूर्णा 19 89
नळगंगा 34 20
पेनटाकळी 16 24
खटकपूर्ण 0 48
ईरई 34 95
  विदर्भातील बहुतांश प्रकल्पांनी तळ गाठला आहे. खरं तर आता पावसाळा संपत आलाय. इथून पुढे तरी पाऊस बरण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या तळ गाठलेल्या पाण्यावर पुढील नऊ महिने कसे काढणार, हा मोठा प्रश्न आहे.