बालाजीचा शालू कोल्हापूरच्या अंबाबाईला नेसवण्याची प्रथा बंद
एबीपी माझा वेब टीम | 20 Sep 2017 11:51 AM (IST)
महालक्ष्मी ही विष्णूची पत्नी असून तिला दरवर्षी मानाचा शालू तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्टकडून येत होता. मात्र अंबाबाईचं महालक्ष्मीकरण थांबवण्यासाठी भक्तांनी ही प्रथा मोडण्याचं ठरवलं आहे.
कोल्हापूर : करवीर निवासिनी ही अंबाबाई आहे की महालक्ष्मी, हा वाद गेल्या काही वर्षांपासून रंगत आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या देवीला बालाजीकडून येणारा शालू नेसवण्याची परंपराच यंदा मोडित काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करवीर निवासिनीला नवरात्रात तिरुपती बालाजी देवस्थानाकडून आलेला शालू नेसवण्याची परंपरा गेल्या 20 वर्षांपासून सुरु होती. मात्र कोल्हापूरची देवी ही अंबाबाई नसून महालक्ष्मी आहे, असं पुजाऱ्यानं म्हटल्याचा दावा भक्तांनी केला आहे. त्यामुळे यंदा कोल्हापूरच्या करवीर निवासिनीला तिरुपतीहून शालू येणार नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. अंबाबाईला महालक्ष्मी करण्याचं कारस्थान असल्याचा आरोप पुजाऱ्यांवर करण्यात येत आहे. महालक्ष्मी ही विष्णूची पत्नी असून तिला दरवर्षी मानाचा शालू तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्टकडून येत होता. मात्र अंबाबाईचं महालक्ष्मीकरण थांबवण्यासाठी भक्तांनी ही प्रथा मोडण्याचं ठरवलं आहे.