नांदेड : शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरले तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसचे (congress) 22 आमदार तयार ठेवले आहेत, असं वक्तव्य शिवसेनेचे (Shiv Sena) नेते चंद्रकाथ खैरे (Chandrakant Khaire) यांनी केलंय. खैरे यांच्या या वक्तव्यानंतर आता वंचित बहूनजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी देखील हाच मुद्दा पकडत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री  अशोक चव्हाण (Ashok Chavan ) यांच्यासह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. " शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरले तर नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.

  
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारवर टांगती तलवार आहे. हे 16 आमदार अपात्र झाले तर पुढं काय होऊ शकतं, याबाबत अनेक नेते अंदाज वर्तवत आहेत. यामध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सर्वात आधी काँग्रेसचे 22 आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली. त्यानंतर प्रकाश आबंडेकर यांनी खैरेंचा मुद्दा पुढे करत काँग्रेसवर टीका केली.  16 आमदार अपात्र ठरले तर नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. 


अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्यात एकदा-दोनदा भेट देखील झाली आहे. ही भेट भाजप प्रवेशासाठीच असल्याचे तर्क लढवले जात आहेत. त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.  "सध्या जे शिल्लक राहिलं आहे ते वाचवण्यात काँग्रेस आपलं हित पाहत आहे. काँग्रेसमधील नितीमत्ता संपली आहे. दहा पिढ्या बसून खातील एवढं त्यांच्याकडे आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.  


दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर देखील टीका केली आहे. राहुल गांधी यांचा भारत जोडोचा उपक्रम चांगला आहे. परंतु, यातून फार काही हाती लागेल असं वाटत नाही. राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. मात्र त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नाही. सध्याचं सरकार हे लुटारुंचं सरकार आहे, राहुल गांधींनी हे मांडायला शिकलं पाहिजे. पण काँग्रेस वाले हे सर्व मांडू शकत नाहीत. कारण तेही यात एकेकाळी तेच सहभागी होते. देशात खासगीकरण काँग्रेसच्या काळात सुरू झालं, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.