शेतकऱ्याने कांदा विकून मिळालेले सगळे पैसे मनीऑर्डरने मोदींना पाठवले!
एबीपी माझा वेब टीम | 01 Dec 2018 08:55 AM (IST)
कांद्याला मिळालेल्या तूटपुंज्या दराबाबत सरकारचा निषेध करण्यासाठी निफाडच्या नैताळे गावामधले शेतकर संजय साठे यांनी गांधीगिरी पद्धत अवलंबली.
नाशिक : उन्हाळ कांद्याला केवळ एक ते दीड रुपया भाव मिळत असल्याने निराश झालेल्या नाशिकच्या शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीऑर्डर केली. संजय साठे यांच्या सात क्विंटल 50 किलो कांद्याला लासलगाव बाजारसमितीत केवळ 1 हजार 64 रुपये मिळाले. ही रक्कम ऑनलाईन मनीऑर्डरद्वारे पंतप्रधान कार्यालयातील आपत्कालीन निधीसाठी सरकारचा निषेध केला. गेल्या काही दिवसापासून सातत्यने कांद्याच्या भावात घसरण सुरु आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही भरुन निघत नाही. कांद्याला मिळालेल्या तूटपुंज्या दराबाबत सरकारचा निषेध करण्यासाठी निफाडच्या नैताळे गावामधले शेतकर संजय साठे यांनी गांधीगिरी पद्धत अवलंबली. संजय साठे यांनी ट्रॅक्टरभर कांदा निफाड बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. "शेतकरी, व्यापारी बंधूंनो, आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून त्याकडे कुणीही गांभीर्याने पहात नाही. शेतकऱ्यांच्या या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळाव्यात या उद्देशाने आज मी आणलेल्या सर्व कांद्याचे पैसे ऑनलाईन मनीऑर्डरद्वारे पंतप्रधानांना पाठवणार आहे. मी हे कुठल्याही राजकीय हेतूने करत नसून केवळ शेतकऱ्यांच्या व्यथा पंतप्रधानांना कळाव्यात या उद्देशाने करत आहे," असा मजकूर त्यांनी ट्रॅक्टरवर लिहिला होता. साठे यांच्या कांद्याला प्रति क्विंटल अवघा 151 रुपयांचा दर मिळाला. अशाप्रकारे सात क्विंटल पन्नास किलो कांद्याचे त्यांना 1 हजार 64 रुपये मिळाले. यामुळे त्यांचा उत्पादन खर्चही भरुन निघाला नाही. यानंतर त्यांनी स्वत:च्या खिशातून 54 रुपये खर्च करत 1,064 रुपयांची सगळी रक्कम पंतप्रधान कार्यालयात मनीऑर्डरने पाठवून सरकारचा निषेध केला