नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून अनलॉक 4 मध्ये नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.येत्या 7 सप्टेंबरपासून दिल्ली मेट्रोसेवा सुरु होणार असून आंतरराज्य आणि राज्यांतर्गत व्यक्ती आणि माल वाहतुकीला सूट देण्यात आली आहे. म्हणजेच देशात कुठेही मुक्त संचार करता येणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी, ई-पासची गरज राहणार नसल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. परंतु कायदा आणि सुव्यवस्था तसंच आपत्ती व्यवस्थापन हे राज्य सूचीतील विषय असल्याने राज्य सरकारच्या नियमावलीची प्रतीक्षा केली जात आहे.


शाळांबाबत निर्णय


शाळेचे नियमित वर्ग बंदच राहतील, मात्र 21 सप्टेंबर पासून शाळा व्यवस्थापन 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत बोलावू शकतं म्हणजे ऑनलाईन शिक्षण शाळेतून करण्याचा प्रयत्न आहे. कंटेन्मेंट झोन वगळता अन्य ठिकाणची नववी ते बारावीतील विद्यार्थी शाळेत शिक्षकांशी अभ्यासाचं मार्गदर्शन घेण्यासाठी जाऊ शकतात.


सांस्कृतिक कार्यक्रम


लग्न आणि अंत्यसंस्कार यासाठी सध्या असलेली माणसं जमवायची मर्यादा 20 सप्टेंबर पर्यंत कायम राहील. 21 सप्टेंबरपासून राजकीय सभा, मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रमसाठी 100 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.


राज्यात कोरोनाची स्थिती काही केल्या कमी होतान दिसत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी योग्य खबरदारी सरकारकडून घेतली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ई-पास बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला तरी  आहे. ई-पास बंद करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. मात्र ई पास रद्द करण्याची मागणी आता जोर धरत आहे. आता राज्याच्या निर्णयाकडे लक्ष आहे.