Corona News Update : कोरोनाने (Corona) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. आज राज्यात 226 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. राज्यातील कोव्हिड ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 900 पार झाली आहे. वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याला पत्र लिहिंलं आहे. या पत्रातून राज्याला खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  


राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता केंद्रीय आरोग्य सचिवांच्या खबरदारी घेण्यासह गाईडलाईन्सनुसार टेस्टींग करण्याच्या सूचना राज्याला दिल्या आहेत. "कोव्हिड केसेसच्या नव्या क्लस्टर्सवर देखरेख ठेवणे, इन्फ्यूएन्झा आणि सारीच्या केसेसवर देखरेख ठेवणे, आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आणि लोकल क्लस्टर्समधील रुग्णांचे जिनोम टेस्टींग करणे, बूस्टर डोससंदर्भात जनजागृती वाढवत पात्रधारकांना लस देणे, गर्दीच्या ठिकाणी कोव्हिड नियमांचे पालन होत आहे की नाही याची खबरदारी घेणे असा सूचना केंद्राकडून राज्याला देण्यात आल्या आहेत. 


महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकात कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या पाच राज्यांना आरोग्य सचिवांनी पत्र लिहिले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात 8 मार्चपर्यंत आठवड्यात 355 कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली.  परंतु 9 ते 15 मार्च दरम्यान 688 रूग्ण आढळून आले आहेत. गुजरातमध्ये गेल्या दोन आठवड्यांत संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात तेथे 279 प्रकरणे आढळून आली आहेत. तेलंगणामध्ये कोरोनाचा संसर्ग दर 0.31 टक्के, तामिळनाडूमध्ये 1.99 टक्के, केरळमध्ये 2.64 आणि कर्नाटकमध्ये 2.77 टक्के नोंदवला गेला आहे. त्यामुळे या राज्यांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 


Corona News Update : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढली


राज्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. आज राज्यात 226 करोनाचे नवे रूग्ण आढळले आहेत. 14 मार्च रोजी 155 रुग्ण, तर 15 मार्च रोजी 176 रुग्णांची नोंद झाली होती. राज्यातील कोरोना पाॅझिटिव्हीटी रेट देखील वाढला आहे.  15 मार्चपर्यंत राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 1.92 टक्क्यांवर असून देशाचा पाॅझिटिव्हिटी रेट फक्त 0.61 टक्के आहे.   


गेल्या वर्षभरापासून कोरोना रूग्णांमध्ये मोठी घट झाली होती. त्यामुळे देशातील कोरोना नियमांध्ये देखील शिथिलथा आणली होती. परंतु, वर्षभराच्या विश्रांतीनंतर कोरोनाने पुन्हा एकदा  डोके वर काढले आहे. कोरोना महामारीमुळे आधीच मोठे नुकसा झाले असून आता पुन्हा कोरोनाची चौथी लाट आली तर लोकांची आणखी नुकसान होणार आहे.  त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी केंद्रासह राज्याच्या देखील आरोग्य यंत्रणांनी खबरदारीच्या उपाययोजना आखण्यासा सुरूवात केली आहे.