सोलापूर : मराठवाड्यातील धरणांपाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातल्या उजनी धरणाचे दरवाजेही उघडले आहेत. मुसळधार पावसामुळे उजनी धरणाचे 7 दरवाजे 23 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत.


उजनी धरण 104 टक्के भरल्याने, दोन वर्षांनंतर धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे भीमेच्या काठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

लातूरमधील 1265 नागरिकांचं स्थलांतर

दरम्यान, इकडे मराठवाड्यात पावसानं हाहाकार माजवल्यानंतर आज पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. तावरजा, उजेड, मावलगाव, रेणापूर अशा ठिकाणी पुरात अडकलेल्या तब्बल 60 जणांना एनडीआरएफनं सुखरुप वाचवलं आहे. शिवाय लातूर जिल्ह्यातील 16 गावातील 1265 नागरिकांनी स्थलांतरित केलं आहे. आज मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरेल, मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो, असं भाकित हवामान खात्याने वर्तवलं आहे.

बीड जिल्हा पाणीदार

गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या तुफानी पावसाने बीड जिल्हा पाणीदार झाला. शहराला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, प्रकल्पातून होणाऱ्या विसर्गामुळे नदीला पूर आला आहे. त्यामुळे अख्खं बीड जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अनेक भागात घरातही पाणी शिरल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान ग्रामीण भागातही पावसाने कहर केला असून पाटोदा, धारुर आणि आंबाजोगाई तालुक्यात पावसाने सारे विक्रम मोडले आहेत. पाटोद्यातील पुरामुळे दहा गावांचा संपर्क तुटला असून पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

उस्मानाबादलाही पावसाचा तडाखा

उस्मानाबादमध्येही तुफान पाऊस झाल्याने भोगावती नदीला पूर आला आहे. जिल्ह्यातील सर्व तलाव, नदी, नाले, ओसंडून वाहत आहेत. कालच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा भूम, वाशी, ईट या भागांना बसला. त्यातच बीडमध्ये नगरपरिषद अभियांत्रिकी सेवेच्या परीक्षेला जाणारे विद्यार्थी अडकून पडले. त्यामुळे त्यांना परीक्षा देता आली नाही. तसंच तुळजापूर तालुक्यातल्या कात्री, अपसिंगा गावातली शेकडो एकर शेती वाहून गेली. तर तेरणा मध्यम प्रकल्प तब्बल दहा वर्षानंतर भरला आहे.