भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक अमरावतीऐवजी मुंबईत
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2016 03:59 PM (IST)
मुंबई: भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक अमरावतीऐवजी आता मुंबईत होणार आहे. येत्या 5 आणि 6 ऑक्टोबरला होणार असून गृह आणि नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हट्टापायी हा बदल करण्यात केल्याचे समजते. डॉ. पाटील हे अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आहेत. ही निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणे अपेक्षित होते. त्यामुळे या कार्यकारिणी बैठकीचा पाटील यांच्या निवडणुकीला फायदाच झाला असता. पण, निवडणूक आयोगाने मतदार याद्या नव्याने तयार करूनच ही निवडणूक घ्यावी, असे आदेश दिल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलली गेली आहे. त्यामुळे नवी मतदार नोंदणी करुन घेण्याचे काम भाजपासह सर्वच पक्षांना लागणार आहे. 1 ऑक्टोबरपासून एक महिना ही नोंदणी करावी लागणार असल्याने अमरावतीमध्ये होणारी बैठक मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन स्थळ बदलण्याची मागणी केली. त्याला दोघांनीही हिरवा कंदील दिल्याने ही बैठक मुंबईला होणार आहे.