निर्णयापासून माघार नाही, स्वबळावरच लढणार : उद्धव ठाकरे
एबीपी माझा वेब टीम | 06 May 2018 03:26 PM (IST)
स्वबळावर निवडणूक लढणार, या निर्णयापासून माघार घेणार नाही, असं म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नाशिक : स्वबळावर निवडणूक लढणार, या निर्णयापासून माघार घेणार नाही, असं म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिथे जिंकू, त्या तीन जागांवर उमेदवार दिले आहेत. स्थानिक पातळीवर जे जमेल ते करा, असे आदेश विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. सीमा भागातील मतदारांनी दुही न माजविता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागे उभे राहावे. सीमा भागात शिवसेना उमेदवार देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. छगन भुजबळ, एकनाथ खडसे यांच्या बाबतीत काय घडलं ते जनतेने बघितलं आहे, त्याबाबत सध्या भाष्य करणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. नाणार प्रकल्पाला विरोध कायम कोकणातील नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. सरकारने कितीही प्रयत्न केले तरी हा प्रकल्प होऊ देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. वनगा कुटुंबियांनी मागितली तर उमेदवारी देणार पालघरचे दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या परिवाराकडे भाजपकडून दुर्लक्ष झालं, म्हणून त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. वनगा कुटुंबियांनी लोकसभेसाठी जागा मागितली तर त्यांना उमेदवारी देणार असंही त्यांनी जाहीर केलं.