मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी सरकारनं घेऊ नये, त्यासाठी पर्यायी जागा शोधाव्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आज अधिग्रहणासाठी नाही तर शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी गेले असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.


शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे, त्यामुळे समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात असतील तर असा अन्याय शिवसेना कधीही सहन करणार नाही, तसंच ज्या जमिनींचं अधिग्रहण केलं जाईल त्यासाठी शेतकऱ्यांची परवानगी घेण्यात यावी आणि योग्य मोबदला द्यावा अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केली.

आपल्या स्वप्नासाठी शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा करणं योग्य नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय न होता विकास होणार असेल तर तो शिवसेनेना मान्य असेल. अन्यथा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनींचं अधिग्रहण शिवसेना कधीही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शिवसेना आणि मंत्र्यांची  भूमिका वेगळी नाही : एकनाथ शिंदे

शिवसेना आणि मंत्र्यांची भूमिका वेगळी नाही, त्यामुळे पक्ष आणि पक्षप्रमुख जो आदेश देतील तो आम्ही कार्यकर्ते म्हणून मान्य करु असं एकनाथ शिंदेनी सांगितलं. पक्षप्रमुखांच्या आदेशावरुनच आज अधिग्रहणाच्या ठिकाणी गेलो होतो. मात्र शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी त्याठिकाणी गेल्याचं स्पष्टीकरणंही एकनाथ शिंदेंनी दिलं. कुणावर अन्याय होत असेल तर मला सांगा, मंत्री म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून मदत करेन असा शब्दही त्यांनी दिला.

रामदास कोविंद यांना फोनवरुन शुभेच्छा : उद्धव ठाकरे

रामदास कोविंद यांनी मला फोन केला होता, त्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मी शुभेच्छा दिल्या आहेत, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय.