मुंबईः अॅट्रॉसिटी कायद्यावर शरद पवार यांना काय बोलायचं ते त्यांनी स्पष्ट बोलावं. सरकारनेही यावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं. सर्व पक्षीयांशी चर्चा करावी, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.


 

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई आणि नागपुरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना अॅट्रॉसिटीच्या वादावर सेनेची भूमिका स्पष्ट केली.

 

मराठा समाजाच्या भावना लक्षात घ्याव्या- उद्धव ठाकरे

अॅट्रॉसिटीवरुन जातीय तेढ वाढू नये, ही शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे सरकारने दोन्ही समाजाला विश्वासात घेणं गरजेचं आहे. मराठा समाजाचे उत्स्फूर्त मोर्चे हे भावना व्यक्त करणारे आहेत. त्यांच्या भावनांचा उद्रेक होण्याआधी मोर्चांना सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

 

उद्धव ठाकरेंचा पवारांवर घणाघात

अॅट्रॉसिटीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना जोरदार लक्ष्य केलं. मराठा समाजाला पवारांची निती चांगली माहिती आहे. त्यामुळे पवारांचा मुस्लीम आणि मराठा समाजाशी जवळीक वाढण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पवारांवर टिका केली.