नाशिक: महाराष्ट्रात सरकार बदल होऊन अडीच वर्षे झाली, मात्र काहीच बदललं नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, आम्ही बाहेरुन विनाशर्त पाठिंबा देतो, कर्जमाफी केल्यास सरकारला धक्का लागू देणार नाही, असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. ते शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते.


निवडणुकीपूर्वी काळा पैसा भारतात आणू, त्यामुळे प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, असं सांगितलं जात होतं, मात्र एकही पैसा आला नाही. आता शेतकऱ्याची कर्जमाफी करा किंवा त्याच्या खात्यात 15 लाख रुपये भरा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

महत्त्वाचं म्हणजे या मेळाव्याला शिवसेनेच्या आमदार-खासदारांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टीही उपस्थित होते.

"मुख्यमंत्री विरोधात असताना कर्जमाफी मागायचे,


आता सत्तेत आल्यानंतर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यांत रुपांतर झाले.


सरकार बदलले पण प्रश्न सुटत नाहीत.


मध्यावधीसाठी चाचपणी काय करताय, शेतकरी कर्ज मुक्त करा,


माझे सर्व मंत्री सत्ता सोडून बाहेर पडून तुम्हाला सत्तेसाठी पाठिंबा देतील",


असं उद्धव ठाकरे म्हणाले.


यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

साल्यांची सालपटं काढतील

"गाडीवरचा दिवा गेला पण यांच्या मनातला गेला नाही. दानवेंच्या वक्तव्याने तळपायाची आग मस्तकात गेली. आता शेतकरी रडणार नाही साल्यांची सालपटं काढतील", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारे आम्ही कपाळकरंटे नाही. कर्जमाफी तात्पुरता इलाज असेल, पण तात्पुरता तरी इलाज करा, पुढचं पुढं बघू, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

तूर घोटाळ्याची चौकशी करा

आता मन की बात नाही, शेतकऱ्याची बात करा. शेतकरी तूर तूर करतोय आणि हे सत्तातूर झाले आहेत. तूर घोटाळ्याची आधी चौकशी करा. विक्रमी उत्पादन होणार होतं तर आयात करण्याचा निर्णय कुठल्या सुपीक डोक्यातून आला त्याचं आधी मॅपिंग करा, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

15 लाख खात्यावर भरा

शेतकऱ्यांची कर्ज माफीची मागणी मी मागे घेतो. पण त्यासाठी तुम्ही लोकांना त्यांच्या खात्यावर 15 लाख रुपये भरण्याचं आश्वासन पूर्ण करा, असंही उद्धव यांनी नमूद केलं.

सरकारमध्ये शेतकऱ्याबद्दल बोलणारी 10 तोंडं झाली आहेत. नोटबंदीच्या काळात गैरव्यवहार झाले म्हणून जिल्हा बँकांवर बंधन लावले, मग खाजगी बँकांवर कारवाई करण्याची हिंमत सरकारमध्ये आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

एकदा मदत दिली की माज इतका चढतो की तुम्हाला साले म्हणा नाही तर आणखी काही म्हणा, मला राज्यात अशांतता पसरवायची नाही. पण जे धुमसत आहे त्याकडे वेळीच लक्ष द्यावे लागेल, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला.

माझ्याकडे देण्यासारखं काही नाही, फक्त साथ देऊ शकतो, शेतकऱ्याला साथ द्यायला आलोय, असं त्यांनी नमूद केलं.

नारायण राणेंना टोला

विरोधी पक्षात नालायक लोक बसले आहेत. आम्हाला सत्ता सोडायला सांगतात आणि स्वतःच भाजप प्रवेशासाठी गुप्त बैठक करतात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राणेंवर प्रहार केला.

समृद्धी महामार्गाला विरोध

यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध केला.

शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करुन समृद्धी महामार्ग नको. दोन्ही राजधान्या जोडाव्या, पण शेतकऱ्यांचा सत्यानाश करुन नाही, असं उद्धव म्हणाले.



उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारे आम्ही कपाळकरंटे नाही - उद्धव ठाकरे
- कर्जमाफी तात्पुरता इलाज असेल, पण तात्पुरता तरी इलाज करा, पुढचं पुढं बघू - उद्धव ठाकरे
- शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करुन समृद्धी महामार्ग नको - उद्धव ठाकरे
- आता मन की बात नाही, शेतकऱ्याची बात करा - उद्धव ठाकरे
- कर्जमाफी द्या, आम्ही बाहेरुन विनाशर्त पाठिंबा देतो - उद्धव ठाकरे
- मुंबई-नागपूर या दोन्ही राजधान्या जवळ याव्यात, पण शेतकऱ्यांचा सत्यानाश करुन नाही - उद्धव ठाकरे
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा फायदा काय? - उद्धव ठाकरे
- कर्जमाफी करा किंवा शेतकऱ्यांना 15 लाख द्या - उद्धव ठाकरे
- सत्तेला लाथ मारायला मला एका क्षणाचाही विलंब लागणार नाही - उद्धव ठाकरे
- एका महिन्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मोर्चा विधानसभेवर न्यायचं आहे - उद्धव ठाकरे
- समृद्धी महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनात शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरेल - उद्धव ठाकरे