नांदेड : यांचा पक्ष राज्यातला, देशातला, जगातला इतकंच काय तर चंद्रावरचाही सगळ्यात मोठा पक्ष आहे. मंगळावरुनही यांना मिस्ड कॉल येतात, आम्हाला मेंबर करुन घ्या, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली आहे. नांदेड महापालिकेच्या प्रचारानिमित्त उद्धव यांनी सभा घेतली.


यांचा पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, पण स्वतःच्या निष्ठावान उमेदवारांची कमतरता असल्यामुळे इतर पक्षातील उमेदवारांना घेतलं जात आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

पंतप्रधानांना कुठे दिवाळी दिसते माहीत नाही, मला तर दिसत नाही. साडेतीन वर्षात कधी जन्मगाव आठवलं नाही, मात्र गुजरात निवडणुका दोन महिन्यांवर आल्या असताना नरेंद्र मोदींना वडनगर आठवलं, तिथली शाळा आठवली, अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

गुजरात निवडणूक आली की खाकऱ्यावर जीएसटी कमी करता आणि पत्रकार परिषदेत हे आवर्जून सांगता, वडापाववर जीएसटी असेल, तर तो माफ केला का ते सांगा, असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून विचारलं.

भाजपमध्ये दम नसल्यामुळे दुसऱ्यांचा पेहलवान घेत आहेत, आमच्या तालमीत तयार झालेला पहेलवान कशाला घेता, तुम्ही तुमचा तयार करा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर अप्रत्यक्ष टीका केली.

भगिनींची छेड काढणाऱ्यांना फटके देण्याऐवजी भगिनींना फटके देणारा भाजप आहे. कोपर्डी प्रकरणाचा कधी निकाल लागणार? असा सवाल करत मेणबत्या नाही, तर अत्याचार करणाऱ्यांना पेटवून टाका असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

तुम्ही चोरुन पाठिंबा घेता, आम्ही उघड सत्तेत सामील झालो, विरोधही उघडपणे करतो. सरकारला वाचवणारे अदृश्य हात  काँग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत, असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केला. अशोक चव्हाण यांना नांदेडकर कसे काय डोक्यावर घेतात, कळत नाही, असंही उद्धव म्हणाले.

आम्ही वाचनपूर्ती केली म्हणून मुंबई महापालिका पाचव्या वेळेस आम्हाला मिळाली. आम्ही वाट लावणारे नाही, तर वाट दाखवणारे आहोत, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. विकासाबरोबर प्रकाशही गायब झाल्याची टीका त्यांनी केली.

उद्या मुख्यमंत्री येतील आणि नांदेडला 25 हजार कोटींचा निधी देण्याची घोषणा करतील, हे मी आजच सांगतो. कल्याण डोंबिवलीत असंच झालं, असंही उद्धव यांनी सांगितलं.