मुंबई : संकट समोर असताना निवडणुकांचा मुद्दा डोक्यात तरी कसा येतो? असा सवाल करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. परिस्थिती बिकट असून यामध्ये राजकारण करू नका असे आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील पूरस्थिती गंभीर आहे. पूरग्रस्तांसाठी आवश्यक सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. या संकटकाळात निवडणुकांचा मुद्दा डोक्यात कसा येतो? या स्थितीत राजकारण करू नका, असे ठाकरे म्हणाले.

ही परिस्थिती भयानक आहे. विचित्र परिस्थिती आहे. यातून बाहेर पडणं महत्वाचं आहे. कोण कमी पडतंय यावर चर्चा करणे महत्वाचे नाही. आमचे शिवसैनिक त्या ठिकाणी आहेत. आता आपण काय करावं याकडे सध्या लक्ष देणे गरजेचे आहे. ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या देखील रवाना केल्या जातील. पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना लागेल ती मदत करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.



आपलं सरकार आणि कर्नाटक सरकारमध्ये समन्वय होता की नाही याबाबत कालांतराने सत्य समोर येईल. कर्नाटक सरकार जर धरणातून पाणी सोडण्याच्या कामात काही पाप करत असतील तर सत्य बाहेर येईलच, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.