मुंबई: ‘शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं न झाल्यास शिवसेना सत्तेची पर्वा करणार नाही.’ असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला आहे. पहिल्यांदा संपाची ठिणगी पेटवणाऱ्या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.


‘सरकार दिलेल्या हमीला जागेल त्यामुळे यापुढे लढण्याची वेळ येऊ नये आणि तशी वेळ जर आली तर शिवसेना सत्तेची पर्वा करणार नाही.’ असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे. ‘मला सरकारची भाषा कळत नाही, मला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन हवा.’ अशी मागणीही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवसेनेनं संपाला उघड पाठिंबा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचा संप यशस्वी झाला असा दावा यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

दरम्यान, चंद्रकांत पाटील उद्या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या भेटीदरम्यान ते उद्धव ठाकरेंचं कर्जमाफीसंदर्भातंल शंकांचं निरसन करणार असल्याचं समजतं आहे.