Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे जुने विश्वासू सहकारी रविंद्र वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी शिंदे गटाकडून हालचाली सुरु आहेत. वायकरांच्या उमेदवारीवरून अनिल परब यांनी द्याच म्हणून आव्हान दिले असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही (Uddhav Thackeray on Ravindra Waikar) वायकरांच्या उमेदवारीवर भाष्य केलं आहे. 


तुमची ओरिजिनल लोक होती ती कुठं गेली?


उद्धव ठाकरे म्हणाले की, एवढी भाड्याने लोकं का घेता? इंजिनाची चाक निखळून स्टेपनीवर जात आहे का?? तुमची ओरिजिनल लोक होती ती कुठं गेली? आज माझ्याकडे भाजपची लोक येत आहेत ती तुम्हाला कंटाळली आहेत. त्याचा विचार पक्षाच्या हितासाठी त्यांच्या नेतृत्वाने करावा. कधी एकेकाळी मी त्यांचा मित्र होतो. त्यांनी आपला चेहरा आरशात पाहावा. एवढ्या मेकअपची गरज का लागते याचा विचार करा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. 


घोसाळकरांच्या उमेदवारी काय म्हणाले?


घोसाळकर काँग्रेसच्या चिन्हावर लढणार का? यावरही उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, घोसाळकर यांच्या फक्त हातात, मनगटात नाही तर त्यांच्या मनामध्ये शिवसेना आहे. घोसाळकरकडून दुसऱ्या पक्षातून उमेदवारी घेणे  शक्य नाही. घोसाळक कट्टर कार्यकर्ते आहेत, त्यांच्या मनामध्ये हृदयात शिवसेना आहे. 


राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्यावर काय म्हणाले?


उद्धव ठाकरे म्हणाले की, यांचं कौतुक करतो काही जण बिनशर्त पाठिंबा देतात, तर काहीजण लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत. हे नाटक जनता ओळखत आहे. आता थेट हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढत होणार आहे. माझं मत मी मांडलं आहे, एकाधिकारशाही देशाला घातक आहे. हुकूमशाला पुन्हा एकदा देशाने स्वीकारणे घातक आहे. आपल्याला वाटतं संमिश्र सरकार नको, पण इतिहास जर बघितला, तर अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा संमिश्र सरकार चांगल्या प्रकारे चालवलं होतं. नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी सुद्धा चांगलं सरकार चालवलं. संमिश्र सरकारच्या काळात देशाची प्रगती झाली आहे. आम्हाला देश मजबूत पाहिजे असेल, तर सरकार संमिश्र हवं, असे ठाकरे यांनी नमूद केले. 


तर स्वातंत्र्य राहणार नाही 


संपूर्ण देश एका पक्षाकडे दिला तर तो देशाचा गळा गोठल्याशिवाय राहणार नाही, हे आता लोकांना कळलं आहे. कणखर नेता आपल्याला हवा, पण तो सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा हवा. जो देईल साथ त्यांचा करू घात  असा  पक्ष आम्हाला नको आहे. आपण मागील दहा वर्षात एक पक्ष एक व्यक्ती आता संपूर्ण देशात ते एकच पक्ष ठेवण्याच्या मागे लागले आहेत. ही वृत्ती घातक आहे त्यामुळे एका व्यक्तीच्या हातात देश देणे घातक आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचं मत स्वातंत्र आहे. हुकूमशाही सरकार आलं तर हेही स्वातंत्र्य राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या