आघाडी सरकारचं कौतुक होत असल्यास आपण नालायक : उद्धव
एबीपी माझा वेब टीम | 09 Apr 2016 01:02 PM (IST)
कोल्हापूर : 'राज्यात युतीचं सरकार आल्यानंतरही जर काँग्रेस-राष्ट्रवादीचं नाव निघत असेल तर आपल्याला नालायक म्हणण्याशिवाय दुसरा शब्द नाही', अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दुष्काळाच्या मुद्द्यावरुन भाजप नेत्यांना सुनावलं आहे. कोल्हापुरात उद्धव ठाकरेंच्या हस्ते माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं, त्यावेळी त्यांनी भाजपला कानपिचक्या दिल्या. 'सध्या महाराष्ट्रात भीषण स्थिती आहे. मराठवाडा-विदर्भात पाण्याचा ऐतिहासिक तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जोवर महाराष्ट्रातील दुष्काळ दूर होत नाही, तोवर सत्ताधारी आणि विरोधकांनी बाकीचा वाद बाजूला ठेऊन एकत्रितपणे काम करायला पाहिजे' असंही उद्धव म्हणाले. यावेळी व्यासपीठावर भाजप नेते आणि सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटीलही उपस्थित होते. मराठवाड्यात गेल्या वर्षभरात हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही सरकार दुष्काळावर उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याची टीका होत आहे.