Uddhav Thackeray  live press conference : शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीन नावे निवडणूक आयोगाकडे दिली असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्याशिवाय त्यांनी पक्षासाठी तीन चिन्हेही निवडणूक आयोगाकडे दिल्याचं सांगितलं. यामध्ये त्रिशूळ, मशाल, उगवता सूर्य ही तीन चिन्हं दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. निवडणूक आयोगानं लवकरात लवकर निर्णय द्यावा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 


40 डोक्याच्या रावणानं प्रभू रामाचं शिवधनुष्य गोठवलं. यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेलं रक्तच पाहिजे. कारण शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्त आणि तापलेलं डोकं. गोठलेल्या रक्तवाल्याचं इकडे कामच नाही. उलट्या काळीजवाल्याचं काम नाही. अशी काही माणसं आणि त्यांची माणसं फिरतात, त्याचा राग येतो. ज्या शिवसेनेनं तुम्हाला राजकीय जन्म दिला. जी शिवसेना तुमची राजकीय आई आहे. त्या आईच्या काळजात कट्यार घुसवली. अशी ही उलट्या काळजाची लोकं, त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवलं. त्यांना आनंदानं उकळ्या फुटत असतील. पण त्याही मागे त्यांच्या मागे जी महाशक्ती आहे. तिला जास्त आनंद होत असेल. बघा आम्ही करुन दाखवलं.  जे आम्हाला जमलं नाही,  ते त्यांचीच माणसं फोडून करुन दाखवलं. कशीही माणसं काय मिळवलं तुम्ही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 


ज्या शिवसेनेनं मराठी माणसाला आधार दिला. मराठी मनं पेटवली आणि हिंदु आस्मिता जपली. त्या शिवसेनेचा घात करायला निघालात. ते पवित्र नाव गोठवलं. काय मिळणार आहे तुम्हाला... मराठी माणसाठी केलेली एकजूट तुम्ही फोडायाला निघालात. या देशात हिंदु म्हणायची कुणाला हिंमत नव्हती, तेव्हा बाळासाहेबांनी ती हिंमत दिली. ती हिंमत तुम्ही गोठवली.  हे हिंदुत्व असेच उभं राहिलं नाही, बाळासाहेबांनी अंगावर धोके स्वीकारलेत, असे ठाकरे म्हणाले. तुमचा आणि शिवसेनेचा संबंध काय?... जे नाव माझ्या आजोबांनी दिलं.. वडिलांनी रुजवलं. तेच मी पुढे घेऊन जातोय. तुम्ही त्याचा घात करताय, असेही ठाकरे म्हणाले. 


 मुख्यमंत्रीपद ज्यांना हवं होतं, त्यांनी ते घेतलं. त्यांच्याबरोबर ज्यांना सगळं काही देऊनही मनात एक धुसफूस होती. आणखी काही होतं, नाराज होते. देतोय तरी नाराज होते, तेही गेले.  आपण बोललो नाही असं नाही, ते सहन केलं. पण आता जरा अति झालं. शिवसेना प्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको. मीच व्हायला पाहिजे. इथपर्यंत कुणाकुणाचे हट्ट, मनसुबे असू शकतात. पण आता स्वत: शिवसेनाप्रमुख व्हायला निघालेत. हे जरा अति होतंय. त्याच्यासाठी अवाका काय? याचाही आपल्याला विचार करायचा आहे. 


शिवतिर्थावर दसरा मेळावा, होऊ नये म्हणूनही खोकासूरांनी प्रयत्न केले. मैदानच शिवसेनेला मिळता कामा नये, म्हणून प्रयत्न केले. पण अखेर न्यायदेवता.. देवता या शब्दाला जागली आणि न्याय दिला. दसरा मेळाव्याला गर्दी झाली. चांगला प्रतिसाद मिळाला. त्या दिवशी दोन दसरा मेळावे झाले असे म्हणतात... एका ठिकाणी सर्व काही पंचतारांकित होतं. पण दुसऱ्या बाजूला शिवसैनिक होते. काही दिव्यांग होते, नेत्रहिन होते, काही लांबून चालत आले होते. यांची काय व्यवस्था होती, काय पंचपक्वान होतं. पण ते स्वत:ची मिठभाकरी घेऊन आले होते. आर्धी भाकर खाईल उपाशी राहिल.