कोल्हापूर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मोर्चांबाबत केलेल्या वक्तव्यांवरुन नवा वाद होण्याची चिन्हं आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपतींपाठोपाठ उदयनराजे भोसले यांनीही बडोलेंवर निशाणा साधला आहे.


बडोलेंनी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव येते, असा घणाघात उदयनराजेंनी केला. मराठा क्रांती मूक मोर्चासाठी उदयनराजे कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

यापूर्वी संभाजीराजेंनीही बडोलेंसारख्या माणसांना महाराष्ट्रातून हद्दपार करायला हवं, असं म्हटलं होतं.

सरकारने आधीच निर्णय घ्यायला हवा होता

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत काही वर्षांपूर्वीच सकारने निर्णय घ्यायला हवा होता, असं उदयनराजे म्हणाले.

बडोलेंच्या बुद्धीची कीव

बडोलेंनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव येते. अशा वक्तव्यामुळे समाजामध्ये वितुष्ट निर्माण होते, असंही उदयनराजेंनी सांगितलं.

अॅट्रॉसिटी कायदा रद्दच झाला पाहिजे. इतर समाजाचे मोर्चे प्रतिउत्तर म्हणून काढले जात आहेत, हे हसू येण्यासारखे आहे.ही मोर्चांची स्पर्धा नाही, असं उदयनराजेंनी नमूद केलं.

पैसेवाल्यांची आंदोलने यशस्वी होत आहेत: राजकुमार बडोले

कोपर्डीच्या नावाखाली जर अनुसुचित जातींच्या लोकांवर अन्याय होणार असेल, तर तो आम्ही सहन करणार नाही, प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, तसेच आज पैसेवाल्यांची आंदोलनं यशस्वी होत आहेत, असं खळबळजनक वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलं. ते काल औरंगाबादेत इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिवलमध्ये बोलत होते.

बडोले यांनी सध्या आरक्षणासाठी निघणाऱ्या मोर्चांवरही जोरदार हल्ला चढवला. ”कोणीही येतं आणि आरक्षणाची मागणी करतं. ज्याच्याकडं पैसे जास्त आहेत, त्यांची आंदोलनं यशस्वी होतात,” असंही ते यावेळी म्हणाले.

राजकुमार बडोलेंसारख्या लोकांना महाराष्ट्रातून हद्दपार करा: छत्रपती संभाजीराजे

‘मराठा मोर्चांचं चुकीचं चित्रण करुन महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सामाजिक न्याय मंत्र्यांना राज्यातून हद्दपार करा’, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. मराठा मोर्चाआधी ते आज कोल्हापुरात एबीपी माझाशी बोलत होते.

संबंधित बातम्या

राजकुमार बडोलेंसारख्या लोकांना महाराष्ट्रातून हद्दपार करा: छत्रपती संभाजीराजे

पैसेवाल्यांची आंदोलने यशस्वी होत आहेत: राजकुमार बडोले