चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोराडीसह अनेक ठिकाणी वीजनिर्मिती प्रकल्पातील 2 संच तांत्रिक कारणामुळे बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल 1 हजार 160 मेगाव्हॅट वीजनिर्मितीवर परिणाम होत असून, राज्यात भारनियमन वाढण्याची चिन्हं आहेत.


राज्यात विजेच्या एकूण मागणीच्या तुलनेत वीजपुरवठा कमी असताना महानिर्मितीच्या कोराडीसह चंद्रपूर वीजनिर्मिती प्रकल्पातील संचच बंद पडलं आहेत. कोराडी आणि चंद्रपूरमधील प्रत्येकी एक अशा 1 हजार 160 मेगावॅटचे दोन संच तांत्रिक कारणाने बंद पडले आहेत. त्यामुळे राज्यात ग्राहकांना जास्त प्रमाणात भारनियमनाचे चटके सहन करावे लागण्याचा धोका आहे.

कोराडीत वीजनिर्मिती 660 मेगावॅटचा युनिट क्रमांक 10 चा बेल्ट अलायमेंट तुटलं आहे. तर चंद्रपूरात काही संचात कोळशातून ज्वाळा तयार होणाऱ्या प्रक्रियेत बिघाड झाल्यामुळं हे संच बंद पडल्याचे महानिर्मितीकडून सांगितलं जातं आहे.

दरम्यान, विजेचा पुरवठा कमी पडू नये म्हणून महानिर्मितीने कोयनातील जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती वाढवली आहे. पण पाण्याअभावी हे संच लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन्ही संच त्वरित सुरू झाले नाही तर राज्याला मोठय़ा प्रमाणावर भारनियमनाचे चटके सहन करावे लागण्याची चिन्हं आहेत.