गडचिरोली : राज्यातल्या आदिवासी वसतीगृहांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असल्याचं चित्र आहे. याच विरोधात गडचिरोलीतल्या भामरागडच्या वसतीगृतील विद्यार्थी गेले तीन दिवस उपोषण करत आहेत. मात्र अजूनही त्या ठिकाणी कुठल्याही अधिकाऱ्याने भेट दिलेली नाही.

भामरागडच्या वसतीगृहाची इमारत अत्यंत जुनी असल्याने त्यामध्ये विद्यार्थ्यांना शौचालयाची सुविधा मिळणंही कठीण झालं आहे. सोबतच गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याने, मुलांच्या जेवणाची आबाळ होते.

यासंबंधी मुलांनी वारंवार तक्रार केल्यानंतर पुढचे 3 महिने असंच जेवण मिळणार असल्याचं कंत्राटदाराने मुलांना सांगितलं जात आहे. त्यामुळे कंत्राटदार आणि अधिकारी हात मिळवणी करून विद्यार्थ्यांचा निधी लाटत असल्याचं संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून, अजूनपर्यंत या विद्यार्थ्यांच्या उपोषणाची दखल शासनस्तरावरुन कोणीही घेतलेली नाही.