अहमदनगर/बीडः भगवान गडावर दसरा मेळावा होण्यासाठी 25 ग्रामपंचायतींनी ठराव केला आहे. तर ऊसतोड कामगार आणि मुकादम संघटनेनेही पंकजा मुंडेंच्या भाषणाचा आग्रह धरला आहे. त्यासाठी जास्तीत जास्त ऊसतोड कामगारांना गडावर येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे दसरा मेळाव्याच्या भाषणातून ऊसतोड कामगारांना मार्गदर्शन करत. ऊसतोड कामगार आणि गोपीनाथ मुंडे यांचं अतूट नातं होतं. त्यामुळे पंकजा मुंडे यांनीही यावर्षी गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच दसरा मेळाव्यातून मार्गदर्शन करावं, असा आग्रह ऊसतोड कामगार संघटनेने धरला आहे.
भगवान गड परिसरातील 25 ग्रामपंचायतींनी दसरा मेळावा होण्यासाठी ठराव आणला आहे. पंकजा मुंडेंचं भाषण होणारच, असं आव्हान ग्रामपंचायतींनी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांना दिलं आहे.
अटलजींच्या कवितेच्या आधारने पंकजांचा प्रहार पंकजा मुंडे यांनीही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
''बाधाएँ आती हैं, आएँ धिरें प्रलय कि ओर घटाएँ, पावों के निचे अंगारे सिर बर बरसें यदी ज्वालाएँ, निज हाथो में हँसते-हँसतें जलना होगा कदम मिलाकर चलना होगा'' ही अटलजींची कविता पंकजांनी ट्विटरवर शेअर केली आहे.