मुंबई : गोवा महामार्ग हा सततच्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. 2017 या वर्षामध्ये पनवेल ते कसाल (सिंधुदुर्ग) या 450 किमीच्या अंतरामध्ये 878 अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातामध्ये 1283 प्रवासी जखमी झाले, तर 103 प्रवाशांचा बळी गेला.


मुंबई-गोवा महामार्गावरून बेदरकारपणे चालणाऱ्या आणि नियमाचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करत एक लाख एक हजार 504 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यातून दोन कोटी तीन लाख 47 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मुंबई-गोवा महामार्ग वीकेंड, शिमगा आणि गणपती सणाच्या काळात गजबजलेला असतो. दरवर्षी पोलीस, बांधकाम विभाग, आरटीओ यांच्याकडून अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. वाहनचालकांना सुरक्षिततेबाबतचे धडे दिले जातात. डोळे तपासणी शिबिर घेतली जातात. मात्र, एवढं होत असताना वाहनचालकांकडून त्याचप्रमाणे सहकार्यदेखील अपेक्षित असते.

मुंबई-गोवा महामार्गावर खड्डेही मोठ्या प्रमाणात आहेत. पळस्पेपासून पुढे निघाल्यानंतर खड्डे चुकवत वाहनचालकांना प्रवास करावा लागतो. या अपघातांना थांबवण्यासाठी अद्यापही कोणाकडे उपाय नाही. हे सर्व झालेल्या अपघाताची नोंदीव्यतिरिक्त महामार्गावर किरकोळ अपघातांची नोंद नाही. वाहनचालकांनी आपसामध्ये तडजोड करून मिटवली आहे.